Demo Site

Tuesday, June 14, 2011

आयुर्वेद: परंपरा आणि ग्रंथसंपदा




आयुर्वेद हा संस्कृत भाषेतील शब्द असून त्याचा संधिविग्रह (आयुः) जीवन + विद्या (वेद) अशाप्रकारे होतो. आयुर्वेद आणि त्यासारख्या विद्याशाखांमधून भारतात प्राचीन काळापासून असलेल्या वैद्यकीय ज्ञानाची कल्पना येते. आयुर्वेदाला सुमारे ३००० वर्षापासून चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग परंपरा आहे. आयुर्वेदातील उपचार पद्धतींमध्ये वनौषधी,वनस्पतीजन्य औषधी, आहाराविषयक नियम, व्यायामाचे विविध प्रकार आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकार शक्तीला वाढविण्यावर भर दिला जातो.
  • इतिहास

आयुर्वेदातील काही वनस्पती औषधांचे संदर्भ हे मुख्य चार वेदांपैकी एक असलेल्या अथर्ववेद या इसवी सनपूर्व सुमारे १२०० मध्ये रचल्या गेलेल्या वेदामधून घेतले आहेत. आणि त्यामुळे आयुर्वेद हा अथर्ववेदाचा एक घटक समजला जातो. तथापि, विशेषतः गौतम बुद्ध यांच्या आणि त्यानंतरच्या काळात, आयुर्वेदामध्ये अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींची भर घालण्यात आली. समुद्रमंथनातून निघालेले भगवानधन्वंतरी हे आयुर्वेदातील परंपरेनुसार आद्य वैद्य मानले जातात.

परंपरा आणि ग्रंथसंपदा

आयुर्वेदात मूलतः दैवी आणि मानुषी अशा दोन परंपरा (Schools of Thought) आहेत. मानुषी परंपरेत चरक संहिता, सुश्रुत संहिता, काश्यप संहिता ह्या तीन संहितांमध्ये तीन वेगवेगळ्या परंपरा वर्णन केलेल्या आहेत. त्यापैकी महर्षि चरक आणि महर्षि सुश्रुत यांनी प्रत्येकी एका परंपरेची स्थापना केली आणि त्यानंतर अनेक वर्षे त्यांच्या शिष्यगणांनी हे ज्ञान आत्मसात करून वाढविले. चरक संहिता आणि सुश्रुत संहिता हे दोन ग्रंथ याच परंपरांचा सारांश आहे आणि म्हणून हे ग्रंथ कोणी एका लेखकाने लिहिलेले नाहीत. तिसरी परंपरा कश्यपांची आहे. आयुर्वेदातील या विविध परंपरांनी सुमारे बाराशे वर्षांचा काळ व्यापलेला आहे. गौतम बुद्धाच्या काळापासून (सुमारे इसवी सनपूर्व ५५६) ते सम्राट हर्षवर्धनाच्या काळापर्यंत (सुमारे इसविसन ६००) या परंपरांचे कार्य चालत होते. पण तीन शाखांचे औपचारिक सिद्धांत आणि युक्त्या मूळ बौद्ध साहित्यात दिसून येतात. चरक आणि सुश्रुत संहितांचे बर्‍याच लोकांनी संपादन केले आहे आणि अनेक शतकांनंतर त्यांच्यामध्ये अगणित आवर्तने झाली आहेत. आयुर्वेदामध्ये शल्यचिकित्सेचीही जी परंपरा आहे तिची सुरूवात सुश्रुताने केली असे मानतात.
इसवीसनाच्या सातव्या शतकात सिंध प्रांतात राहणार्‍या वाग्भट यांनी सुरुवातीच्या आयुर्वेदिक साहित्यांचे एकत्रीकरण केले. त्याला अष्टांग संहिता असे म्हणतात. चरक, सुश्रुत आणि वाग्भट यांचे काम आयुर्वेदाचा मूळ आधार समजले जाते आणि या तिघांना आदराने वृद्ध त्रयी , बृहद त्रयी या नावांनी ओळखले जाते. त्यानंतर आठव्या शतकात वैद्य माधव ऋषि यांनी निदान ग्रंथ हा ग्रंथ लिहिला जो थोड्याच काळात प्रमाण बनला. यातील ७९ प्रकरणांमध्ये विविध विकार, त्यांची लक्षणे, कारणे आणि क्लिष्टता याबद्दल चर्चा केली आहे.
आयुर्वेदात मुख्यतः वनस्पती व त्यांचे वेगवेगळे भाग, कंदमुळे यांच्यापासून तयार झालेली औषधे वापरतात. पहिल्या सहस्त्रकानंतर रासायनिक औषधेही थोड्याप्रमाणात वापरली जाऊ लागली. आठव्या शतकात उग्रादित्य आणि चौदाव्या शतकात सरनगध्र यांनी बर्‍याच रासायनिक औषधांचा अभ्यास केला. विंचू, साप, कोळी इ. प्राण्यांच्या विषांचाहीप्राणीज औषध म्हणून वापर केला जातो. विषौषधाचा अभ्यास करणारी अगदतंत्र ही आयुर्वेदाची एक शाखा आहे.
  • मार्गदर्शक आणि मूळ तत्वे 

    • पंचमहाभूते  

प्राचीन सांख्यदर्शन या दर्शनशास्त्रावर आयुर्वेद आधारलेले आहे . त्यात सर्व भौतिक जग हे पाच मूळ तत्त्वांपासून तयार झाले आहे असे मानले जाते. यातील प्रत्येक मूळ तत्त्वाचे स्वत:चे काही गुण आहेत. ही मूळ तत्त्वे खालीलप्रमाणे आहेत -
  • आकाश
  • वायू
  • अग्नी
  • आप (पाणी)
  • पृथ्वी 
    • गुण

गुण विरुद्ध गुण
गुरू (जड) लघु (हलका)
मंद (हळूहळू) तीक्ष्ण (तीव्र)
हिम, शीत (थंड) उष्ण (गरम)
स्निग्ध (तेलकट, ओशट) रूक्ष (कोरडा)
श्लक्ष्ण (गुळगुळीत) खर (खरखरीत)
सांद्र (घन, दाट) द्रव (पातळ)
मृदू (मऊ, कोमल) कठीण (बळकट, दृढ)
स्थिर (टिकाऊ) चल, सर (गतिमान)
सूक्ष्म (अतिशय बारीक) स्थूल (मोठा)
विशद (स्वच्छ) पिच्छील (बुळबुळीत)
  • दोष

सर्व शारीरिक प्रक्रिया तीन दोषांच्या संतुलनातून नियंत्रित केल्या जातात, असे आयुर्वेद मानते.
  •   वात दोष

वात शरीर आणि मनाची हालचाल नियंत्रित करतो. जास्त वातामुळे काळजी, निद्रानाश, बद्धकोष्ठता, इत्यादी त्रास होतात. वात रक्त पुरवठा, श्वासोच्छ्‌वास, मनातील विचार इत्यादी गोष्टींवर नियंत्रण ठेवतो. वातामुळे मज्जासंस्था, श्रवण, वाणी कार्यान्वित होतात. वातामुळे उत्साह आणि सर्जनक्षमता वाढतात. वाताचा पित्त आणि कफ यांच्यावरही परिणाम होतो. बर्‍याचवेळा वातदोष हे रोगाचे पहिले कारण असते. वाताला वायू असेही म्हणतात.
  •  कफ दोष

कफ आपतत्त्वापासून बनतो असे मानले जाते. कफामुळे शरीरातील मूलद्रव्यांना मूर्त स्वरूप मिळते, प्रतिकारशक्ती वाढते. कफ सांध्यामधील स्नेहक(lubricant), जखम भरणे, ताकद, संतुलन, स्मरणशक्ती, हृदय व फुप्फुसे यांना नियंत्रित करतो. कफामुळे आपुलकी, प्रेम, शांतता हाव, मत्सर हे गुण मिळतात. अतिकफामुळे स्थूलता, सुस्ती आणि प्रत्युर्जता ((ऍलर्जि) allergy) इत्यादी त्रास होतात.
  • पित्त दोष

पित्ताची निर्मिती आप आणि अग्नि या तत्त्वांपासून होते असे मानले जाते. पित्त शरीरातील उष्णता, चयापचय, मन आणि शरीर यांचे रूपांतरण, अन्नपचन, संवेदना, सदसदविवेकबुद्धी इत्यादी गोष्टींवर नियंत्रण ठेवते. अति पित्तामुळे राग, आलोचना, व्रण, पुरळ, इत्यादी त्रास होतात. संतुलित पित्ताने नेतृत्व गुण विकसित होतात.

उपचारपद्धती
  • पंचकर्मे

  • वमन

  • विरेचन

  • बस्ती

  • नस्य

  • रक्तमोक्षण

औषधपद्धती

  • आसव   

  • काढा

  • घन

  • चूर्ण

  • तैल

  •  घृत

    0 comments:

    Related Posts Plugin for WordPress, Blogger...

    लेखनाधिकार

    myfreecopyright.com registered & protected Creative Commons License
    upakram by upakram.blogspot is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
    Based on a work at upakram.blogspot.com.
    Permissions beyond the scope of this license may be available at http://upakram.blogspot.com/.

    Followers